*लेखिका* *अनुपमा जाधव* *उपक्रमशील, आदर्श शिक्षिका,* *शाळा..के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू* श्रावण महिन्यात पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण येतो.भाऊ बहिणीच्या या पवित्र प्रेमाला राखी पौर्णिमेच्या दिवशी जणू उधाणचं येते.या दिवशी बहिण सुंदर पाट मांडते.पाटाभोवती विविध कलाकुसरतेने रांगोळी काढते.व भावाला ओवाळण्यासाठी ताटाची आकर्षक सजावट करते.भावाच्या कपाळावर कुंकू, अक्षदा लावते.व त्याला ओवाळते, राखी बांधते.मिठाई भरवते. भावाचे तोंड गोड करते.मग भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणीच्या ताटात पैसे, भेट वस्तू देतो.त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार तो आपल्या बहिणीला ओवाळणी देऊन खूष ठेवतो. आपल्या भावाची प्रगती व्हावी आणि त्याचबरोबर त्याने बहिणीचे रक्षण करावे.ही त्यामागची भावना असते.आपला भाऊ सुखी, समाधानी, आनंदी असावा.त्याने आपल्या आई वडिलांचा ,परीवाराचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा असे प्रत्येक बहिणीला वाटत असते. तसेच आपल्या बहिणीला ही कोणत्याही प्रकारची उणिव भासू नये यासाठी भाऊ तिला एखाद्या फुलाप्रमाणे जपत असतो.एवढं राखीच्या धाग्याचं महत्त्व आहे. ...