नाटकाला शोभेल अशी शरीर यष्टी नाही, प्रभावित करेल असे रुपही नाही, तरीही दादा कोंडके नावाच्या अवलियाने तमाम मराठी प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले. ज्यांच्याकडून मराठी शब्दाचा शब्द न शब्दाचा अर्थ सविस्तरपणे शिकावं तसेच ज्याच्या नावावर चित्रपट चालतात आणि प्रेक्षक पुन्हा-पुन्हा गर्दी करतात. अशा काही मोजक्या भाग्यवंत कलाकारांपैकी दादा एक.
दादा कोंडके यांचा जन्म ८ आँगस्ट १९३२ रोजी मुंबईतील नायगाव परिसरातील गिरणी कामगाराच्या घरात झाला.त्यामुळे त्यांचे नाव श्रीकृष्ण ठेवण्यात आले.बालपणापासूनच दादा वात्रट होते. मस्ती त्यांच्या नसानसांत भिनलेली. त्यामुळे ते राहत असलेल्या मुंबईच्या परळ, नायगाव भागात खोड्या-भांडण करणारा म्हणून दादांची ओळख होती, त्यांच्या रोजच्या त्रासाला त्यांची आई सखुबाई वैतागलेली असायची, त्यांचे वडील खंडेराव हे गिरणीत कामाला होते. भविष्यात पोराचे कसे होणार? ही चिंता दादांच्या आई-वडिलांना सतत भेडसवायची. अभ्यासतही दादांचे फारचे लक्ष नसायचे. गुंडगिरी करणाऱ्या मित्रांच्या सहवासात त्यांचा जास्तीत जास्त वेळ जात असे.
दिवसेंदिवस वाढत जाणारा दादांचा द्वाडपणा कमी व्हावा, म्हणून धोंडीराम या मोठ्या भावाने त्यांना अपना बझारमध्ये नोकरीला लावले. राजाराम गोलटकर नावाच्या नवीन चित्रपट दिग्दर्शकाकडे साहाय्यक म्हणून दादा काम करु लागले. चित्रपटांची सलगता लिहिण्याचे काम करीत असताना दादाच्या हातून सतत चुका व्हायच्या. दिग्दर्शकाची येता-जाता बोलणी खाऊनही दादा या नोकरीत काही काळ तरी टिकले. याच दरम्यान दादांच्या वडिलांचे व पाठोपाठ आईचेही निधन झाले. शिक्षणात रस नसल्यामुळे दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर दादांनी शिक्षणाकडे कायमची पाठ फिरवाली. त्यांच्या घराच्या जवळच असलेल्या श्रीकृष्ण बँंड पथकामध्ये त्यांचे येणे-जाणे होते. बँड पथकाच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्र सेवादलाच्या कार्यालयात मोठमोठ्या व्यक्तींचा राबता असे. त्यांना जवळून पाहता यावे म्हणून दादा सेवादलामध्ये सहभागी झाले आणि त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही भाग घेऊ लागले. तिथेच त्यांची निळू फुले. राम नगरकर यांच्याशी ओळख झाली. या ओळखीचे पुढे घट्ट मैत्रीत रुपांतर झाले.
कला कथक बंद पडल्यावर दादांनी स्वतःच लोकनाट्याची निर्मिती करुन ते रंगभूमीवर आणायचे ठरवले. जवळ पैसा नसल्यामुळे मित्र मंडळीकडून पैसे घेऊन वसंत सबनीस लिखित 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्य दादांनी रंगभूमीवर सादर केले. त्यात दादांनी रंगविलेल्या हवालदाराची भूमिका खूपच गाजली. प्रत्येक प्रयोगाला त्या-त्या दिवशी घडलेल्या राजकीय परिस्थितीवर ते विनोदी टीका करत. राजकीय नेत्यांचीही ते खिल्ली उडवत. हजरजबाबीपणामुळे दादांचा प्रत्येक प्रयोग रंगात येई आणि प्रेक्षक हसून हसून बेजार होत. विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यामुळे दादा कोंडके हे नाव महाराष्ट्रात सर्वोत्मुखी झाले. या लोकनाट्यातील दादांची भूमिका पाहून खुश झालेले चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी त्यांच्या "तांबडी माती" या चित्रपटात दादांना संधी दिली. आशा काळे, अनुपममा यांच्याही भूमिका होत्या, मात्र हा चित्रपट फारसा चालला नाही.
'विच्छा' या प्रयोगातून जमलेल्या पैशांतून एखादा व्यवसाय करण्याचा विचार होता. पण त्याऐवजी चित्रपटनिर्मिती करण्याचा सल्ला भालजींनी दिला. चित्रपटसृष्टीत नवीन असणाऱ्या दादांना त्या काळातील अभिनेत्रींनी त्यांच्याबरोबर चित्रपटात काम करण्यास नकार दिला. तेव्हा दादांनी उषा चव्हाण यांना नायिकेची भूमिका दिली. याचित्रपटाचे नाव होते सोंगाड्या. गोविंद कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. भालजींच्या सांगण्यावरून दादांनी अर्धीविजार, गुडघ्यापर्यंत लोंबणारी नाडी, सैल सदरा असा गबाळा नायक साकारला आणि तो प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. सोंगाड्या पूर्ण झाला तरी तो प्रदर्शित करण्यासाठी कोणीच वितरक पुढे येत नव्हता, दादांनी अनेक खटपटी करुन पुण्यातील भानुविलास चित्रपट गृहामध्ये तो प्रदर्शित केला, प्रेक्षकांना तो एवढा आवडला की त्याने चक्क रौप्य महोत्सव साजरा केला. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी सोंगाड्याने तुफान यश मिळवले आणि दादा कोंडके नावाचा 'ब्रँँड'च तयार झाला. पहिल्याच चित्रपटाच्या यशानंतर दादांनी 'एकटा जीव सदाशिव' आंधळा मारतो डोळा, तुमचं आमचं जमलं, मुका घ्या मुका या मराठी व हिंदी मिळून १९ चित्रपटांची निर्मिती करुन त्यात भूमिकाही उत्तम साकारल्या.
चित्रपटांत द्विअर्थी संवाद-चपखलपणे वापरण्यात दादा तरबेज होते. या द्विअर्थी संवादामुळे दादांचा सेन्सारच्या सदस्यांशी कायमच वाद व्हायचा. अल्पावधीतच दादांना यशस्वी नायक,निर्माता, दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत नाव मिळाले. त्यांनी स्वतःची चित्रपट वितरण संस्थाचीही निर्माण केली. दादांनी 'अंधेरी रात में दिया तेरे हात में, खोल दे मेरी जुबान, आगे की सोच या हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. त्यात ते स्वतः नायक होते. चांदू जमादार, राम राम आमथाराम या गुजराती चित्रपटांमध्येही दादांनी नायकाची भूमिका केली. दादांच्या एकटा जीव सदाशिव या चित्रपटावरुन प्रेरणा घेऊन कन्नड चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार राजकुमार यांनी बंगा वरती पंजरा या कन्नड चित्रपटाची निर्मिती करुन त्यात मुख्यभूमिकाही केली. महेश मांजरेकर यांचा जिस देश में गंगा रहता है हा गोविंदाची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट म्हणजे दादांच्या 'एकटा जीव'चीच हिंदी आवृत्ती.
राजकुमार यांची प्रमुख भूमिका असलेल्या सनदी अप्पण्णा या कन्नड चित्रपटावरुन दादांनी मराठीत वाजवू का? हा चित्रापट केला. या चित्रपटात दादांनी सनईवादकाची व्यथा मांडणारी गंभीर भूमिका उत्तम पध्दतीने साकारली. चित्रपटाबरोबरच दादांनी राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला व ते शिवसेना प्रमुख बाळासाहे ठाकरे यांच्यासाठी भाषणे करु लागले. पण यि क्षेत्रात सर्जनशील व्यक्तिमत्वाचा टिकाव लागत नाही. विनोदसम्राट दादांना शिकारीचाही नाद होता. आवतीभोवती माणसांचा गोतावळा मजा करुन गप्पाटप्पांच्या मैफिली रंगवण्यात त्यांचा हातखंडा होता. रिकाम्या वेळेत ते पुढील चित्रपटांच्या योजना आखत. अशाच एका नवीन चित्रपटाच्या तयारीत असताना दादांचा १४ मार्च १९९८ रोजी मुंबईतील दादर येथेहृदयविकाराने मृत्यू झाला आणि तमाम मराठी प्रेक्षक मराठी भाषेतील शब्दांची विनोदातून ख-या अर्थाने मांडणी करणाऱ्या दादांना मुकला.आसा दादा पुन्हा होणे नाही.
राजेंद्र चौधरी. बोरीवली.
मो. ९४२३४७२७६५
Comments
Post a Comment