मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर' या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचंही आहे.याच खोलीत जमीनीवर बसून त्यांच्या सहवासात मस्त दोन अडीच तास आमच्या गप्पा झाल्या. त्यांनी त्यांच्या अनेक प्रसिद्ध कविता त्यांच्या मधुर वाणीने सादर केल्या.आम्ही त्यांच्यासमोर मांडी घालून बसून त्यांच्या भरपूर कविता ऐकल्या.
*'महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे '* यांनी बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात *पोर डोंगरावर भाळली* ही कविता व इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकातील *वनवासी* कविता तसेच कला शाखेतील इयत्ता अकरावीच्या पाठ्यपुस्तकात तुकाराम धांडे सरांच्या जीवनावर आधारीत त्यांच्या *जीवनाचा संघर्ष* हा पाठ अशा दोन कविता व एक पाठ महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या अभ्यासक्रमासाठी आहे.याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी दर वर्षी घेत आहेत.तुकाराम धांडे सर हे अगदी हळव्या मनाचे निसर्गावर अपार प्रेम करणारे *रानकवी* आहेत. धांडे सर आजवर असंख्य काव्य संमेलनात मानाच्या स्थानी प्रमुख पाहुणे म्हणून विराजमान झाले आहेत.अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून राहिलेले आहेत.
बॉलिवूड व टॉलीवूड सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार सयाजी शिंदे व नाना पाटेकर हे कलाकार तुकाराम धांडे सरांच्या कवितेचे चाहते आहेत. अनेक स्टेज शो च्या कार्यक्रमात या कलाकारांनी त्यांच्यासोबत त्यांच्या कविता एकत्रित प्रेक्षकांसमोर सादर केलेल्या आहेत. धांडे सरांची *भूगोल* ही कविता सातासमुद्रापार म्हणजेच अमेरीकेमधील माजी राष्ट्राध्यक्ष सर *बराक ओबामा* यांच्यापर्यंत पोहोचली आहे. त्यांना ही कविता अपार आवडलेली आहे. ही कविता वाचून बराक ओबामा धांडे सरांच्या कवितांचे चाहते झाले आहेत.
भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ *शिमला* येथे होणाऱ्या राष्ट्रीय काव्य संमेलनात रानकवी धांडे सर यांनी आपली माय बोली मराठी कविता आपल्या भाषेत आपल्या शैलीत सादर करून अनेक दिग्गज कवींना त्यांच्या कवितेची भुरळ घालायला लावतात. ही जादू आहे कवितेची, त्यांच्या हळव्या स्वभावाची, आणि त्यांच्या मधुर वाणीची. त्यांचे डोंगरावर एकंदरीत निसर्गावर असलेल्या अपार निस्सीम प्रेमाची.
अशा अवलियाला भेटून मला अपार आनंद झाला. त्यांच्या सहवासातील दोन - अडीच तास कसे निघून गेले काही कळलं नाही. पुन्हा त्यांच्या भेटीची ओढ मनात साठवत त्यांचा स्नेह व अनुभव घेऊन आम्ही तिघं विजय सर, पारधी सर व मी संतोष जाधव घरी निघण्यास मार्गस्थ झालो.
धन्यवाद धांडे सर...
आम्हा तीन कवींना आपला अमूल्य वेळ दिलात.आपल्या सोबत मनसोक्त गप्पा मारल्या. आपल्या कवितांचा आशीर्वाद आम्हा नवकविंना दिलात.
मी मनापासून आपले धन्यवाद व्यक्त करतो... धन्यवाद...
संतोष रामचंद्र जाधव
बोरशेती परिस्पर्श स्वप्नोत्सव शहापूर ठाणे
7507015488ज
Comments
Post a Comment