उद्या 15 ऑगस्ट...दिवसभर नदीला पूर यावा तसे सगळीकडून देशभक्तीचे मेसेज एकामागून एक सर्वांना येत राहणार..कोण चौकात गाणे वाजवणार, कोण पूजा ठेवणार , कोण गाड्यावरून,सायकल वरून झेंडे मिरवणार...यात वाईट असे काहीच नाही. उलट आजही आपली देशभक्ती प्रत्येकात शाबूत आहे याचे हे उदाहरण आहे.
पण हीच देशभक्ती आपल्या रोजच्या वागण्यात का? येत नाही ...जेव्हा देशात आतंकवादी हल्ला होतो तेव्हा सगळा देश संतापात शोकात असतो, सगळी यंत्रणा अचानक जागी होते.. कोणाला तरी पकडले जाते..पण हल्ला यशस्वी झाला म्हणजे त्यांचे काम फत्ते झाले असे होते.त्यांना मरणाची भीती नसते..कारण त्यांचा ब्रेन आधीच वॉश केलेला असतो...आपल्याला स्वर्ग प्राप्त होणार आहे याची त्यांना त्यांच्या आका ने हमी दिलेली असते (त्यांच्या भावनेचा,गरिबी अन् अशिक्षिपणाचा फायदा घेत).
अशावेळी जे कोणी बाहेरच्या देशातून आतंकवादी येतात तेव्हा ते एकटे काही करू शकत नाही जो पर्यंत त्यांना आपल्या देशांतून कोणी मदत /सपोर्ट करत नाही..यांची मदत करणारी यंत्रणा शोधून वेळीच ठेचून काढली पाहिजे.. प्रत्येक गल्लीतील,गावातील, चाळीतील,इमारतीतील नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे..,सर्वांनी पोलिस यंत्रणेला सहकार्य करणे,आपल्या आजूबाजूला कोणी अनोळखी लोक राहत असतील तर त्यांच्या संदिग्ध हालचालीवर नजर ठेवून माहिती देणे ही सुद्धा देशभक्ती आहे...
त्याचप्रमाणे आपल्या आया बहिणी रात्री अपरात्री एसटी स्टँड,गावात,शहरात,चौकात,बाजारात इ.कुठे अडकलेल्या असतील तर त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे, महिलांचे रक्षण करणे, वृध्द लोकांची मदत करणे ही एकप्रकारची देशभक्तीच आहे...
जसं सीमेवर जावून लढणे म्हणजे देशभक्ती आहे तशी देशात राहून देशाची सेवा करणे ही सुद्धा देशभक्ती आहे. त्यामुळे देशभक्तीची व्याप्ती फार मोठी आहे...
मिळालेली निवडणूक कर्तव्य पार पाडणे, संकटात लोकांची सेवा करणे,मदत करणे ही देशभक्तीच आहे.
तसेच आपण करत असलेल्या व्यवसायातून,जॉब मधून,कामातून,घरातून लोकांसाठी काही उपयोगी कार्य होत असेल तर तीही देशभक्ती आहे. एखाद्या फळ विक्रेत्याने आवाच्या सव्वा ( हे प्रामुख्याने शहरात मुंबई/पुणे येथे घडतात) किंमती न लावता योग्य दराने फळांची विक्री केली ,तरी ही तो एक प्रकारे लोकांचा फायदा होतो म्हणजे ही सुद्धा त्याच्या हातून घडलेली लोकसेवाच आहे. विद्यार्थांना परीक्षा काळात उशीर होत असल्यास मदत करणे हे सुद्धा देशाचे भविष्य घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे...अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टीतून आपण देशभक्ती साध्य करू शकतो आणि देशाला समृध्द बनवू शकतो...
"प्रजा सुखी तर देश सुखी.." या उक्ती प्रमाणे
प्रत्येकाने आपल्या हातून होईल तशी जनतेची सेवा करा,मदत करा म्हणजे देशातील अडचणी दूर होण्यास मदत होईल आणि यश गाठता येईल पर्यायाने आपला भारत देश खऱ्या अर्थाने एक महासत्ता होईल...
✍️©️अविनाश ठाकूर
डोंबिवली
Comments
Post a Comment