"श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटी चोहीकडे
क्षणात येते सर सर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे
खरंच श्रावण महिना म्हटलं की, बालकवींची ही कविता आपसूकच आठवते. आणि मनात गुणगुणायला सुरुवात होते. या कवितेतून बालकवीने निसर्गाचे सुंदर वर्णन केलेले आहेत. श्रावण महिन्यात आपल्याला या सृष्टीचे सुंदर रूप बघायला मिळते. पावसाच्या रिमझिम सरी....!अंगाला झोंबणारा गारवा.....!! विजांचा गडगडात....जणू काही कानाचे पडदे मेंदूपर्यत जाणारा तो आवाज .....!! पांढऱ्या शुभ्र नभात काळ्याकुट्ट ढगांना आपल्या कुशीत सामावून घेतांचे ते विलोभनिय दृश्य काही वेगळेच .....!आसुसलेली सोनकिरणे, वसुंधरेच्या भेटीसाठी जीवाचा आकांत करीत मिलनाची वाट बघते.....!!जणू एखाद्या समारंभासाठी सज्ज होऊन नटून थटून हिरवा शालू परिधान करून सजलेली सुंदर दिसते. तिचे हे रूप बघून मन अगदी प्रफुलित होते.
आषाढ महिन्याच्या खेळीमेळीनंतर श्रावणाचे सुंदर रूप आपल्याला बघायला मिळते. ऊन पावसांच्या खेळाचा हा महिना कधी कधी आभाळ मेघाने पूर्ण झाकोळून जाते. तर कधी लखलखीत ऊन पडते. तापलेल्या उन्हात पावसाच्या सरीने वातावरणाला पुन्हा नवचैतन्य मिळते.
आषाळ महिना संपताच श्रावणाची सुरुवात होते. श्रावण महिना हा हिंदू पंचांग व भारतीय दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना असतो खरंतर या महिन्यात चंद्र हा श्रवण नक्षत्रात असल्याने या महिन्याला श्रावण नाव पडलेले आहे. श्रावण महिना हा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण महिना हा मराठी महिन्यांपैकी एक महत्त्वाचा समजला जातो श्रावण महिन्याला सणांचा महिना देखील म्हटले जाते. कारण हिंदू धर्मातील बरेच स्त्रीयांचे सण श्रावण महिन्यातच येतात.श्रावण महिना हा चातुर्मासाचा महिना आहे. भगवान शंकराची आराधना पूजापाठ याच महिन्यात केली जाते. श्रावण महिन्याला उपवासाचा महिना म्हणून ओळखला जाते.
श्रावणात सतत पावसाची सरीवर सरी येतात. निसर्ग हिरवागार असतो. सर्वत्र वातावरण आल्हाददायी व उत्साही असते. लतावेली, झाडेझुडपे प्रफुल्लित असतात. सगळीकडे हिरवेगार गवत पसरलेले दिसते. संध्याकाळी आकाशात अनेक रंगानी दाटी केलेली दिसून येते. आणि रिमझिम वर्षाराणी बरसत असते. श्रावणात अनेक पक्षी, फुलपाखरे आनंदाने झाडावर, वेलीवर बागडताना दिसतात. श्रावणात पाऊस तर पडतोच तो सर्वांना हवाहवासा वाटतो. कधी पाऊस पडते, तर कधी लगेच ऊन पडते. हे बघायला मला तरी खूप आवडते.आकाशात सप्तरंगी इंद्रधनुची कमान बघायला मिळते ते बघून मोर सुद्धा आनंदाने नाचू लागतो. सुप्रभातीला अनेक पक्षांची मंजुळ आवाज कानी येतात. निसर्गाचा सौंदर्याची ही लयलूट बघण्यासाठी पर्यटक अनेक ठिकाणी पर्यटनाला जातात. डोंगरदऱ्यातून कोसळणारे उंच उंच धबधबे रान फुलांनी सजलेले माळरान ऊन सावलीचा खेळ इंद्रधनुचा लपंडाव बघायला खूप छान वाटते. श्रावण महिन्यात नागपंचमी,रक्षाबंधन, मंगळागौर, पोळा असे अनेक सण येतात. अनेक हिंदू महिला देव,देवतांची उपासना करतात. असा हा श्रावण सर्वत्र आनंद पसरवित असतो. प्रत्येकांना नवचैतन्य देते.
श्रावणाची सुरुवात नागपंचमीच्या सणांनी होते. आणि दुसरे म्हणजे शुक्ल पक्षात नारळी पौर्णिमा येते. समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा सण खास असतो. कोळी बांधवांचे संपूर्ण कुटुंबाचे जीवन अवलंबून असते. अशा या समिंदराला (सागराला) या दिवशी प्रेमाने नारळ अर्पण करतात. रंगीबेरंगी पारंपारिक पोषाखाने समुद्र किनारा फुलतो. दर्याला नारळ अर्पण करून नव्या मासेमारीसाठी कोळी बांधव समुद्रात होळी सोडतात. नारळी पौर्णिमेच्याच दिवशी रक्षाबंधन हा सण देखील असतो. आपल्या भारतीय संस्कृतीत
भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा असलेला महत्त्वाचा अधोरेखित करणारा हा सण म्हणजे रक्षाबंधन होय. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते व राखी बांधते. आणि भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून प्रेमाने भेट वस्तू देते. बहिणीला भावाने दिलेली ही ओवाळणी लाखमोलाची वाटते. यानंतर येणारा सण म्हणजे जन्माष्टमी (श्रीकृष्ण जन्मोत्सव) होय. भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. अनेक ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा करतात. वर बांधलेली दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे उभारून दहीहंडी फोडतात. हा दहीहंडीचा उत्साह बघण्यासाठी हजारो संख्येने लोक देखील गर्दी करतात. असा हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला व हिंदू सणांनी भरलेला श्रावण मास होय. विवाहित स्त्रिया श्रावणात मंगळागौरी व इतर सण साजरी करण्यासाठी माहेरी जातात. व श्रावण मास संपल्यावर सासरी परततात. गौरी-गणपतीच्या आगमनाच्या तयारीला लागतात. विविध रंगाने नटलेल्या श्रावण मास हा संदेश देत आपला निरोप घेतो.
✍️....लेखिका
सौ.ज्योत्स्ना भास्कर बन्सोड
Comments
Post a Comment