*ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो,ती माणसं कधीकधी इतकी धक्कादायक वागतात की त्या धक्क्याने आपण कोसळून जाऊ असं वाटू लागतं.जवळच्या माणसांनी केलेली वागणूक फार जिव्हारी लागणारे असतात. त्यामुळे लौकिक अर्थाने आपलं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी भावनिक पातळीवर कधीही न भरून निघणारी हानी झालेली असते. अश्या वेळी त्यांची सुध्दा काय अवस्था झाली असेल ह्याचा आपण विचार सुध्दा करत नाही फक्त आणि फक्त आपलाचं विचार आपण करतो
*माणसांवरचा विश्वास उडू लागतो अशाने फार हट्ट करावासा वाटत नाही मग कशात मनही रमत नाही, स्वभाव चिडचिडा होतो आणि कोणाहीसाठी अर्थात या पासिंग फेजेस असतात. त्या येतात आणि काही काळानंतर निघून ही जातात.अशा परिस्थिती समजून घ्यावयांच्या ऐवजी तुमच्यामुळे असे घडले म्हणून त्यास दोष देत असतो .आपण आपल्या मूळ स्वभावावर येतोच पुनःपुन्हा!
*पण तरीही, फार जवळून अनुभवलं की प्रत्येकाचेच पाय मातीचे आहेत हे दिसू लागतं. मग आपण उदास होऊ लागतो. एवढ्यातेवढ्याने भारावून जाण्याचा आपला स्वभाव असू नये आणि कोणालाही त्या व्यक्तीशिवाय आदर्श मानत बसू नये
*माणसं म्हटली की वर्तमानात कमी जास्त गोष्टी व्हायच्याच आणि ते अगदी नैसर्गिक आहे. माणसांतली नाती पूर्णतः नि:स्वार्थ कधीही नसतात आणि त्यात वावगंही काही नाही, हे आपण लक्षात ठेवायला हवं. म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येत नाही.आपलपणं समजल तर आनंदी जीवन होते.पण कोणी सांगितलं म्हणून नाते समाप्त करत असेल तर ते चुकीचं आहे
*प्रत्येक मानवी नात्यात अडचणी येतातच.पण त्या सगळ्या अडचणींवर,कसोट्यांवर मात करून अखेरपर्यंत आपल्यासाठी दुनियाशी लढायला तयार असतात.आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात....ती खरी आपली माणसं. ज्यांचे हात उगीचच निसटले असे राहून राहून वाटते ते खरे सोबती, जी व्यक्ती पुन्हा प्रयत्न सुध्दा करत नाही ते प्रवासातले तात्पुरते सोबती होते इतकंच समजायचं आणि पुढे चालू लागायचं.खरे सोबती मला मिळाले ते माझ्या पुर्वपुण्याई मुळे
*रस्त्यात सांडून गेलेले सगळेच मोती वेचून आणायचं त्राण आपल्यात नसतं आणि प्रत्येकवेळी तसा हट्टही आपण करायचा नसतो.निमूटपणे विनातक्रार आपल्यासोबत चालत आलेल्या पावलांवर भिस्त ठेवायची फक्त.
*ती आणि तेवढीच माणसं फक्त आपली समजायची.ऊस काढताना कोयत्याने पाचट सोलून काढतात,तशी माणसांची निवड करत रहावी लागते कायम, सरावाने 'ओरिजिनल' माणसं ओळखू येतात आपले भले ती चुकत असतील लाखदा, पण आपला हात सोडून जाणार नाहीत, त्यांची आपल्यावर असलेली माया कदापि आटणार नाही अशी व्यक्ती आपल्या जीवनात असावी
*अशी चांगली माणसंही असतात आपल्या आयुष्यात परमेश्वर एकदा तशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाठवते . मात्र आपण त्यास जपायला हवीत....काही लोकांसाठी आपण केवळ 'सोय' असतो. ते त्यांच्या सोयीने आपल्याशी वागतात, गैरसोय वाटेल तेव्हा दूर जातात. आपल्याला कोणीतरी स्वतःच्या सोयीनुसार वापरलं आणि आपण मात्र किती जेन्युईनली त्या व्यक्तीला जपण्याचा प्रयत्न केला हे जेव्हा लक्षात येतं, तो क्षण फार फार दुखरा असतो.
*जगताना सगळीच माणसं लागतात आपल्याला....नाही असं नाही. पण कोणावर विश्वास टाकायचा, कोणाला जवळ करायचं आणि कोणासाठी थोड्याशा गोष्टीसाठी आपले चांगल नातं ठरवायचं. नाहीतर आपला साधेपणा हा भाबडेपणाच्या मार्गाने जाऊन बावळटपणा ठरू शकतो
*अक्षरशः .....का वागत असतील माणसं अशी, का समजून घेण्याची वृत्ती ठेवू शकत नाही ? स्वतःच्या मनासह इतरांना का फसवत असतात ?
*ज्यांच्याशी अगदी पटतच नाही, त्यांच्यासोबत सुद्धा वाद घालून किंवा स्पष्टीकरणं देऊन आपण आपलं मानसिक स्वास्थ्य घालवू नये असं मला वाटतं. कटुता आणून, खळखळ आवाज करत नाती संपवू नयेत. झाडावरून जितक्या सहजतेने फूल निसटतं,तितकी सहजता आपल्यात असावी.एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून बाजूला जाताना स्वतःचे मन मारुन का जगावं.
मुकुंद लाहोटी, सातारा.
Comments
Post a Comment