अल्पवयीन मुलींवरील बलात्कार व अत्याच्याराच्या घडनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुलींची सुरक्षा होणे गरजेचे आहे. समाजातील काही पिसाटलेल्या नराधमांच्या विक्रुतींमुळे मुली मोकळा श्वास घेण्यापासून वंचित आहेत. महाराष्ट्र कायद्याचा धाक जणू संपला की काय? अशी शंका वाटायला लागली आहे. लैंगिक अत्याचार हा एक चिंतनाचा विषय ठरत आहे.
जळगाव जिल्ह्यातील सावदा परिसरातील एका नामांकित शाळेत शिकणारी मुलगी ३० आँगस्ट २०२४ रोजी शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बसची प्रतिक्षा करीत असताना तीन तरुण एका मोटारसायकलवर येऊन मुलीला तिच्या मामाच्या गावाच्या ओळखीचा फायदा घेवून सावदा येथे पोहोचवतो असे सांगून मोटारसायकलीवर बसविले त्यानंतर या नराधमांनी त्या अल्पवयीन मुलीस घरी न सोडता सावदा-मस्कावद रस्त्यावरअसलेल्या एका तुरीच्या व कपाशीच्या शेतात दोघांनी आळीपाळीने पीडितेवर अत्याचार केले तर एकाने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याच आँगस्ट महिन्यात बदलापूर येथे एका शाळेत अल्पवयीन मुलीवर एका सफाई कर्मचा-याकडून अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच काल जळगाव जिल्ह्याच्या सावदा परिसरातील घटना खरोखरच मानवी समाजाला काळीमा फासणारीच आहे.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या सातत्याने घडणाऱ्या घटना पाहता पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात मुली खरोखर सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पडतो. शाळा आणि शाळेच्या परिसरात मुलींवर होणाऱ्या अत्याचारामुळे मुलींना शाळेत पाठवायचे की नाही या चक्रयूव्हात सध्या पालकवर्ग सापडणे स्वाभाविकच आहे. आज कोणतेही पालक आपल्या मुला-मुलींना जवळचे नातेवाईक असो वा ओळखीचे कोणी असो त्यांच्याकडे देखील आपले मुल एकटे सोडून सहजासहजी जात नाही. परंतु शाळा म्हटली म्हणजे त्या विद्या मंदिरात आपला मुलगा-मुलगी सहा तास सुरक्षित असतात, या खात्रीसह विश्वासाने पाठवत असतात आणि निःसंकोचपणे आपल्या प्रपंचात व्यस्त असतात. मात्र अलिकडे शाळा आणि शाळांच्या परिसर सुरक्षित नसून मुलींवर अत्याचाराच्या घटना येथे घडू लागल्याने पालकवर्गासमोर भितीचे वातावारण निर्माण होणे स्वाभाविकच आहे.
एखादी चुकीची घटना घडल्यानंतर तिच्या विरोधात समाजाकडून तीव्र भावना व्यक्त होतात. प्रसंगी घटनेचे गांभिर्य पाहता संबंधितांनी वेळीच कार्यवाही न करता संबंधित गुन्हागाराला पाठिशी घालणे, उघडवा-उडवीची उत्तरे जबाबदार व्यक्तिंकडून दिली जातात. अशामुळे जनतेचा उद्रेक होऊन आंदोलन, निषेध मोर्चे काढले जातात अर्थात अन्यायाच्या विरुध्द लढण्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरावे लागणे ही शोकांतिकातच. मान्य आहे घटनेतील नराधम आरोपींना तात्काळ पकडले जाऊन त्यांच्यावर न्यायालयीन कार्यवाही सुरु आहे. आपल्या देशातील कायदा कडक आहे. शासना कार्यवाहीत दिरंगाई करीत नाही. यासर्व गोष्टी मान्य आहे मात्र लैंगिक अत्याचारांच्या घटना का थांबत नाहीत? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. अत्याचारी नराधमांना कायद्याची जणू भितीच राहिली नसल्याचे वाटते.
शाळा कुठलीही असो त्याठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्याबाबतीत गांभिर्य ठवायलाच पाहिजे. सीसीटीव्ही कँमेरे जागोजागी असणे गरजेचे आहे. शाळेतील प्रशासनाने सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. किमान दोन तीन महिन्यातून कर्मचाऱ्यांमध्ये जागृकतेसह कर्तव्य व जबाबदारीची जाणीव शाळा प्रशासनाने करुन दिली पाहिजे. पालकांनी पालकसभेला तसेच अधून-मधून वर्गशिक्षकांना भेटून संवाद साधायला हवा. बरेच पालक पालकसभेला हजर नसतात किंवा शाळेकडून पालकांना बोलवणे होऊनही पालक कामांच्या व्यस्ततेमुळे येत नाही. परंतु शाळेत खेळताना, एखाद्या विद्यार्थ्याकडून आपल्या पाल्यास मारहाण होणे किंवा शिक्षकाकडून शिक्षा होण्यासारख्या घटना घडल्यानंतर लवाजमा घेऊन ते पालक थेट शाळेत जाब विचारण्याकरीता येतात.
शाळा प्रशासनबरोबरच पालकांनी देखील वेळोवेळी एकमेकांसोबत संवाद साधणे गरजे आहे. लैंगिक अत्याचारासारखा घटना सातत्याने घडत असतात. त्यातील ब-याच समोर येत नाहीत. हे देखील तेवढेच सत्य. अलिकडे तर लैंगिक अत्याचाराचे प्रकार स्वतः घरातून घडत असतात. पीडित मुलगी संकोच बाळगते किंवा भितीपोटी बोभाटा करीत नाही. निर्भया सारख्या अनेक सामाजिक संघटना लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात मुलींमध्ये गुडचट-बँडटच यासह स्वसुरक्षेविषयी जागृती घडविण्याचे काम करीत आहेत. शाळांमध्ये जाऊन या संघटाना सतत मुलींच्या स्वतंत्र सभा प्रबोधन करण्याचे काम देखील करीत असतात व मुलींना बोलत्याकरुन त्यांच्या समस्यांचे निरसन करीत असतात. गावागावातील महत्वाच्या ठिकाणी ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिके सुध्दा सीसीटीव्हि कँमेरे बसविणे आवश्यक आहे.
मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटना ही चिंतेची व गंभीरबाब आहे. सतर्कता ही सर्वांनी बाळगणे गरजेचे आहे. आपल्या गावात, परिवारात, शाळेत लैंगिक अत्याचारीची घटना घडली नाही म्हणून त्याकडे दुर्लक्षही करुन चालणार नाही. सर्वांनी याबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. लैंगिक अत्याचार हा शासनासमोरील एक आव्हानात्मक विषय असून यातून मार्ग काढत मुलींना मोकळा श्वास घेता येईल यासाठी उपाययोजनांसह अंमलबजावणी करणे हिताचे ठरेल.
पिसाटलेल्या मानवा
तुझ्या पिसाटलेल्या क्रुर भावनांना
संवेदनाच आता राहिल्या नाही
त्या कोवळ्या निरपराध बालिकेची
दया तुला कशी आली नाही?
एवढा निष्ठूर-निर्दयी होण्याआधी
तुला तुझी बहिण-मुलगी आठवली का नाही?
तिला ही छत्रपती शिवराय व सावित्रीच्या भूमित
मोकळा श्वास घ्यायचा होता
हे विश्व पाहण्या आधीच तिच्या शरीराचे लचके
तोडण्याच्या पापात तू सहभागी होता
जन्माला येणाऱ्या पिढीने तुमच्याकडून आदर्श
काय घ्यायचा? हा प्रश्न पडतोय आता
प्रत्येक घरात जन्माला येऊ द्या
एकतरी परी
या नराधमांच्या अत्याचारांमुळे
जातोय तिचा बळी
बलात्कारीला जात-धर्म नसतो
ही बात आहे खरी
लैंगिक अत्याचारांमुळे पुरुष जातीची
मान जाते की शरमेने खाली.
राजेंद्र चौधरी.
रोझोदा. ता. रावेर. जि.जळगाव
मो. ९४२३४७२७६५
Comments
Post a Comment