नऊ दिवस झाली तुझी मोठ्या थाटामाटात पुजा.या काळात मिळाला तुझ्या काहीं भगिनींना मानसन्मान.त्या किती ग २०% ही नसतील .पण,उरलेल्या ८०% महिलांचे काय? समानताच नांदतांना दिसत नाही... दिसतो सोयराचार...बोलले तर फार बोलते? किंवा बोलतो?आवाज दाबायचा,प्रकरणे दाबायची,अन् बे एके बे, पाढा पुढे चालू.... असे कित्येक वर्षे गेले,अन् अजून असेच कित्येक वर्षे जातील? तिला न्याय कधी मिळणार? समानता कधी मिळणार? प्रश्न टांगणीला राहणार..पुन्हा हे रहाटगाडगे चालू... हे असेच चालायचे. कोणाला आईच्या दुधाची किंमत तर समजली पाहिजे ना? एका महिलेला दुसऱ्या महिलेची किंमत जेव्हा समजेल ना तेव्हा कोठे समाज जागृत होईल. तीच तिची वैरी बनते.किंवा दाखविली जाते,की भासावली जाते? की, खरचं ९० % महिलाच याला कारणीभूत असतील.जेव्हा आई म्हणून नाही तर एक महिला म्हणून विनाकारण त्रास देणाऱ्या मुलाला तेथेच शिक्षा करावी म्हणजे असे हिंसक राक्षस वाढणार नाहीत.कितीतरी दुर्घटना घडल्या असतील या १० दिवसात,पण,त्या उघड नाही केल्या गेल्या..कारण नऊ दिवस नवरात्र होती ना?...उपभोग म्हणून किती दिवस तिच्याकडे असे पाहणार काही हिंसक नजरा?या नजरा तेव्हाच ठेचल्या तर नको त्या दुर्घटना घडणार नाही.तुम्हाला ही आई होती..जिने जन्म दिला.. तिच्या रक्ताचे दूध तुम्हाला पाजले...तशीच समोरची ही एक कोणाची ना कोणाची माताच आहे,किंवा होणार आहे.ज्या मातेला नऊ दिवस डोक्यावर घेवून मिरवतात...त्याच मातेला माता म्हणून का पहात नाही?
बोटावर मोजण्याइतके काही पुरुष मंडळी खरचं माणूस म्हणून जगतात,आवाज उठवतात,चुकीच्या गोष्टींना विरोध करतात,जाब विचारतात,गुन्हेगाराला शिक्षाही करतात?पण,सगळ्यांच्या मनात कधी येणार हा उच्च विचार.माणूस म्हणून कधी जगणार आणि जगू देणार?प्रश्न मोठा गहन आहे? येथे आपली आई,बहीण सुरक्षित राहिली नाही. आज इतरांची माय,बहीण होती..कधी तुझ्याही आई बहिणीचा नंबर लागेल..मग,तेव्हा काय करणार? का त्या वेळेची वाट पाहत बसणार. जागे व्हा!! ....
नवरात्र संपून दसरा ही झाला... कोणाचा हसरा तर कोणाचा रडका? कधी स्वतःच्या घरातून दूर येवुन पहा...रावण प्रतिकृतीचे दहन केले? पण,तुमच्या दृष्टमनातील रावण कधी मारणार? प्रतिकृती रुपी रावणाचे दहन करण्यापेक्षा जो,कोणत्याही स्री कडे वासनेने पाहतो त्याला भर चौकात जाळले पाहिजे.अशी शिक्षा त्याच वेळी,त्याच ठिकाणी भेटली की,मग कोणताच हात महिलेकडे चुकीच्या दृष्टीने उठणार नाही.आता वेळ आहे,छञपती शिवाजी महाराज्यांच्या राज्यातील न्यायाची.....प्रत्येकाला प्रत्येकाने समजून घेण्याची...ती कधीच नव्हती अबला.....तिचे हरेक रूप कर्तव्याशी प्रामाणिक होते....आणि असते.....जेव्हा ती आवाज उठवते तेव्हा,तिचे रूप विलोभनीय असते... तिचा सन्मान करणे ही आजच्याही काळाची गरज आहे..... सर्वच रूपे तिची कर्तव्य गाजविणारे होते आणि असणार.....तिच्या मूर्तीची पूजा नकोय तिला.....तिला फक्त अन् फक्त माणूस म्हणून जगू द्या.....मुलगी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून जगू द्या.....तिच्या मौनाचा अंत पाहू नका....प्रत्यक्ष कृती दिसू द्या आमलात आणतांना... कपट निती नको....हवे रामराज्य....हवा छत्रपती शिवाजी महाराजांचा न्याय...त्यांची नीती,पद्धत,विचारांची खोली.प्रत्येक स्री ही मातेसमान पाहण्याची दृष्टी...
नवरात्री एकीला पुजायचे अन् एकीला धुडकरायचे? ही कोणती प्रथा? कोणी निर्माण केली ही अमानुष प्रथा.तिच्या अस्तित्वाची किंमत ठेवली पाहिजे?कोणाच्या असल्याने,नसल्याने तिची किंमत करू नका?आईबाप,लेकाविना मान सन्मान मिळवितात? मग,एका पत्नीला तिच्या पतीच्या मृत्युमुळे तो का डावलला जातो?आईबाप जवळचे की पत्नी? नेमके नाते कोणते श्रेष्ठ? हा चर्चेचा विषय नाही,फक्त माणूस म्हणून प्रत्येकाला जगू द्या.कोणत्याही कारणाने कोणाला कमी जास्त लेखू नका? जन्म मृत्यू कोणाला चुकले नाही? ते कोणाच्या हातात ही नाही? मग,कोणी दिला अधिकार तुम्हाला...एकमेकांमध्ये दूजाभाव करण्याचा.फक्त स्री व पुरुष याच दोन जाती...आणि दोघांना समान न्याय.कारण दोघांना जन्म मृत्यू आहे.सजीव सृष्टीची दोन्ही चाके सुरक्षित असले पाहिजे.एकमेकांशिवाय दोघांचे जीवन व्यर्थ.मानवाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर दोघांना समान अधिकार द्या..अन् दोघांनी समान कर्तव्य पूर्ण करावी.दोघांची समान जबाबदारी असावी.एकमेकांना समजून घेणे..आणि त्याप्रमाणे आपले व्यवहार ठेवणे...माणूस आहोत हे कधीही ,कोणी विसरू नये.आपल्यातील कुविचारांचा सैतान जाळला पाहिजे.
सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
Comments
Post a Comment