उतारवयात आल्यावर एका विशिष्ट काळानंतर आपले आईवडील आतून धास्तावत असतात. वाढतं वय आणि हातून सुटत जाणाऱ्या काही गोष्टी त्यांना आपण परावलंबी होत आहोत याची जाणीव करून देतात. काहींना ते सहज स्वीकारता येते तर काहींना ते प्रचंड अवघड वाटू शकते.
अशावेळी अपत्य या नात्याने आपल्याला ती फेज योग्यरीत्या समजली पाहिजे. लहानपणापासून आपण आपले हट्ट त्यांच्यावर थोपवलेले असतात, तरुणपणी आपण आपल्या सडेतोड भूमिका त्यांच्यासमोर मांडलेल्या असतात त्यामुळे आपण हक्काने आपली चिडचिड, राग त्यांच्यासमोर व्यक्त करत आलेलो असतो पण आईवडील उतारवयात आल्यावर अपत्यांनी ही भूमिका बदलायला हवी. कारण या काळात आजारपण, संथपण, असंख्य आठवणींचा भार त्यांच्या मनावर गारूड घालून असतो. आसपासची त्यांच्या वयाची त्यांना सोडून गेलेली माणसं त्यांच्या दुखाचं कारण असू शकतात, ते आपण समजलं पाहिजे. त्यात त्यांना फक्त तुमच्या विश्वासाची आणि दोन आदरयुक्त शब्दांची गरज असते. अशावेळी तुमचा आततायीपणा, राग, हट्टीपणा त्यांना डिप्रेस्ड करू शकतो. त्यामुळे तुम्ही आयुष्यभर जरी आई वडिलांसमोर कोणतेही हक्क गाजवलेले असले तरी आता मात्र तुम्ही त्यांच्या या वळणावर तुमची कर्तव्ये समजून त्यांना जपलं पाहिजे. आणि ते फार सोपं असतं कारण वृद्धापकाळात आईवडिलांना जपायला पैसा नव्हे तर तुमची नियत चांगली असणे आवश्यक असते.
त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना तुमच्याकडे संवेदनशीलता असली तरी खूप काही सोपं होतं. ज्या मायेने त्यांनी लहानपणी तुम्हाला चिऊ काऊच्या गोष्टी सांगून घास भरवलेत... या वळणावर तितक्याच मायेने तुम्हालाही त्यांना घास भरवता आले पाहिजेत. आईवडिलांसाठी थोडं आऊटडेटेड व्हायला काहीच हरकत नसते!
त्यामुळे या काळात त्यांच्याशी बोलतांना, त्यांच्यासोबत वावरतांना त्यांना कंफर्ट झोनमध्ये आणण्याबद्दल दक्ष राहणे आवश्यक आहे. तुमचा एक उंच आवाजही त्यांना धडकी भरवू शकतो... त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी थोडं बदलायला हवं. इतकंच त्यांचं हसू जपायला पुरेसं असतं.
©️ ज्योती हनुमंत भारती
Comments
Post a Comment