माझी प्रतिमा
हा कवयित्री प्रतिमा काळेचा समीक्षणासाठी सप्रेम भेट दिलेला
कविता संग्रह संपूर्ण वाचला.
समीक्षा पब्लिकेशन्स पंढरपूर ने प्रकाशित केलेला व संतोष घोंगडेंनी मुखपृष्ठ चितारलेला हा कविता संग्रह नितांतसुंदर झाला आहे. नवकवयित्रिचा पहिलाच कविता संग्रह आहे.त्या पेशाने शिक्षिका असल्या तरीही त्या उत्तम निवेदिका व संचलनकर्त्याही आहेत.
चला धम्म आचरणात आणू
या कवितेत कवयित्री म्हणते,
धर्म जातिभेद विसरून,
प्रेमाची मशाल घेऊन
भूमीवर समृध्दी आणण्यास
बुध्द नव्याने घेवू समजावून जणू
चला धम्म आचरणात आणू..
या कवितेत जातिभेद विसरून,बुध्द नव्याने समजावून घेऊन धम्म आचरणात आणण्याचा मनोदय व्यक्त करते.
माझे बाबा,या कवितेत ती वडिलांच्या विषयी आदरभाव व्यक्त करताना म्हणते
बाबा सुगंधी कस्तुरी
खोल मायेचा सागर
विचारांनी आयुष्यात
भरी प्रेमाची घागर!!
श्रावण कविता तर श्रावणमासी हर्ष मानसी,ह्या कवितेची आठवण करून देते.
प्रेमाला देई उभारी निसर्ग,
नागपंचमी सण,श्रावण.
माहेरवाशीण माहेराला,
येईल आनंदाला उधान!!
प्रितीचा गुलमोहर ही एक नितांतसुंदर कविता आहे.
प्रेम सागरात भिजताना
तुझ्या आठवणीत जगते
प्रेमळ उबदार मिठीत
गुलमोहर प्रीतीचा फुलवते.
हि एक मिठीत किती मिठास आहे,असेच प्रितीचा गुलमोहर सांगते.
प्रेमाचा दरवळ या कवितेत कवयित्री म्हणते,
गंधित करी मजसी निरंतर,
आठवणीचा असा परिमळ.
सुगंध भरून र्हदयात आज,
चोहीकडे प्रेमाचाच दरवळ
असा आठवण,एक साठवण चा
सुगंध र्हदयालाही गंधित करतो.
नवी वाट हि कविता ही अप्रतिम आहे.
तुझ्या प्रेमात डुंबता
गुंफताना छान वेणी,
कातरवेळेला होते,
तगमग जीवघेणी.
हि तगमग, सख्याच्या प्रेमात डुंबतांना कशी जीवघेणी होते,हे
छान विरह गीतच आहे.
मला डॉक्टर म्हणून हा 'स्तनपान संदेश "हि आवडला कारण आम्ही मंडळी त्यासाठी, स्तनपान सप्ताह"साजरा करतो.
आईचे दूध अमृतासमान
बाळासाठी ठरते वरदान
निरोगी,प्रेमळ जीवनास,
मातांनो करा हो स्तनपान!
व स्तनपानाचे फायदे दोघांनाही आहेत, बाळाबरोबर मातेलाही!
मिलनाची आस मध्ये कवयित्री सांगते,
प्रेमाच्या मिठीत पहुडता,
गाणे गाऊ या पावसाचे!
मिलनाची लागता आस,
धडे मिळाले हो जीवनाचे!
मिलन,मिठी व त्याची आस हा खरंतरं प्रेमी युगुलाचा सुंदर सोहळाच असतो.
अण्णाभाऊ साठे विषयी काढलेले उद्गगार ही मला भावले.
आपणच आपल्या देशात,
दुर्लक्षित केला साहित्य रत्न
हात का असे मागे सरतात?
गौरव करण्यास 'भारत रत्न'
आई माझी कल्पतरू,या कवितेत आईची महती गायलेली आहे.
आई माझी कल्पतरू
आहे मायेचा सागर
जीवनात आनंदाने,
भरे प्रेमाची घागर!
खरंच आईसारखं दैवत जगात नाही.
बाबासाहेब आंबेडकर वरची कविता ही अतिशय सुंदर व अर्थपूर्ण आहे.
बाबासाहेबांची लेखणी धारदार,
अन्यायावर करी गहरी प्रहार!
ज्ञानसूर्याचा सखोल विचारांचा,
लिखाणातून प्रकटे साक्षात्कार!
राजर्षी शाहू महाराज यात ती
सांगते..
शाहू महाराजांनी राज्यात,
जपला जनतेचा स्वाभिमान,
शिक्षणाचा प्रसार करुन हो,
मिळविला रयतेचा मान.
शाहू महाराजांनी कितीतरी लोकोत्तर, काळाच्या पुढची कामे केली.आपल्या संस्थानात त्याकाळी अस्पृश्यांना आरक्षण दिलं.शिक्षणाच्या संधी दिल्या.
समानता, बंधुभाव याची शिकवण दिली.
शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड या राजांनी काळाच्या पुढचे निर्णय त्याकाळी घेतले व ते अंमलात आणले.
पुनर्विवाह
ही कविता ही लक्षवेधी आहे.
अपमानाचे जीवन सोडण्या,
सुखाचे जीवन जगण्यास
पुनर्विवाह करावा लागतो.
हक्काचे नाते जपण्यास.
पुरुष मात्र बायको वारली कि दुसरे लग्न करण्यास तयार!
मात्र स्त्री ला दुसरे लग्न करण्यास मान्यता नाही! व रांडव बाईचे जीणेही कठीण होते.
हि कुठली रीत?
हा काव्यसंग्रह म्हणजे उत्तम प्रतिमांचा,प्रतिमेने दिलेला नजराणाच आहे.व कवयित्री कुठेही नवखी किंवा पहिलाच संग्रह असल्याचे जाणवत नाही.
सौ सुनिता कपाळे यांचे बर्ल्ब ही छानच आहे.
प्रतिमेच्या 'प्रतिमा'चा सुगंध सर्वदूर पसरो हिच ईशचरणी प्रार्थना करतो!
डॉ.राजेश वि. गायकवाड.
प्रोफेसर मेडिकल कॉलेज
तथा लेखक व कवी
सदस्य
साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र शासन मुंबई
२३.०१.२०२५, गुरूवार
पंचवटी नाशिक
९८४८९४१६३५ मोबाईल नंबर
Comments
Post a Comment