नवी मुंबई प्रतिनिधी:- सुचित्रा कुंचमवार
काव्य दरबार उरणचे दरमहा मासिक कवी संमेलन संस्थापक- श्री. के. एम्. मढवी यांच्या चिर्ले येथील "सुपारी बाग" या निवासस्थानी आयोजित केले जाते. सदर कवी संमेलनाचे *हिरक महोत्सवी पोपटी कवी संमेलन व पुरस्कार वितरणाचे आयोजन संस्थापक के. एम्. मढवी यांच्या निवासस्थानी रविवार दिनांक ०२ मार्च, २०२५ रोजी सकाळी- १०:३० ते सायंकाळी- ०५:३० या वेळेत करण्यात आले.
सर्वप्रथम व्यासपीठ निश्चिती कवी/गायक अरुण द. म्हात्रे यांनी केली. त्यामध्ये कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल आणि साई मंदिर वहाळचे विश्वस्त लोकप्रिय माननीय रवीशेठ पाटील साहेब यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून जे. एन्. पी. टी. चे विश्वस्त, धडाडीचे समाज कार्यकर्ते माननीय भूषण पाटील साहेब यांची उपस्थिती लाभली. तसेच रत्न साहेब, चंद्रकांत पाटील जी, रामचंद्र म्हात्रे जी, आणि संस्थापक के. एम्. मढवी साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने व्यासपीठाला विशेष शोभा आली.
व्यासपीठ निश्चितीनंतर मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन झाले. आणि कवी/गायक अरुण द म्हात्रे यांनी सुरेल आवाजात गणेश वंदना सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. एम्. मढवी साहेब यांनी केले. तदनंतर कवयित्री मिनल माळी यांनी सूत्रसंचालन करून मान्यवर आणि उपस्थितांच्या हस्ते पोपटीचे पूजन सुव्यवस्थित केले. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी काव्य दरबारचे सक्रिय कार्यकर्ते श्री हरिश्चंद्र माळी यांच्या जन्मदिनानिमित्त शाल/पुष्पगुच्छ आणि कौतुक प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. प्रमाणपत्राचे वाचन कवी रामचंद्र म्हात्रे यांनी केले. कविश्री अरुण द. म्हात्रे. यांना "जगदंब" पुरस्कार प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार शाल/पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय- रवीशेठ पाटील साहेब यांनी आपल्या मोजक्या शब्दात कवी संमेलन, कवी आणि कवींच्या कविता याबाबत खूप मोलाचे मार्गदर्शन करून साई मंदिर वहाळ येथे खूप मोठे कवी संमेलन भरवण्याबाबत इच्छा प्रकट केली.
यानंतर पोपटीचा आस्वाद घेण्यात आला. तदनंतर कवयित्री मिनल माळी यांनी निवेदन करून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थीना पुरस्कार वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरणानंतर आगरी भाकरी-भात-मटन अशा रुचकर भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला. काही शाकाहारींची सोय करण्यात आली होती. याबाबत के. एम्. मढवी आणि त्यांच्या परिवाराचा मोलाचा आणि मोठा वाटा आहे. सर्वांचे भोजन उरकल्यानंतर जे. एन्. पी. टी. चे विश्वस्त आदरणीय भूषण पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित कवी कवयित्रींचे कवी संमेलन घेण्यात आले. सु-नियंत्रित सूत्रसंचालन अरुण द. म्हात्रे, रेशमा ठाकूर व सुचित्रा कुंचमवार यांनी केले. यामध्ये अंदाजे ३५ कवी/ कवयित्रींनी वेगवेगळ्या विषयांच्या बहारदार रचना सादर केल्या.
अध्यक्षीय मनोगतात भूषण पाटील साहेब यांनी साहित्याची गोडी काय असते? तसेच कवींच्या कवितेत किती ताकद असते? तसेच भविष्यात आपण सर्वांनी किती सतर्क आणि कसे जागृत राहायला हवे? याबाबतचे मोलाचे मार्गदर्शन अगदी सोप्या शब्दांत केले. त्यानंतर मीनल माळी यांनी आभार प्रदर्शन केले.
शेवटी कवी/गायक अरुण द. म्हात्रे. यांच्या सुरेल आवाजात आणि पूर्ण शांततामय वातावरणात पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
अशाप्रकारे सदर पोपटी कवी संमेलन सु-नियोजनाने, वेळेत आणि आनंदात पार पडले.
Comments
Post a Comment