Skip to main content

विचार हवा व्हायला

   
         आज जिकडे तिकडे स्पर्धा चालू आहे असे जाणवते म्हणजे १०१% ती चालूच आहे.पण,एकमेकांशी स्पर्धा करून काय साध्य करणार आहोत आपण?तोडा, फोडा आणि राज्य करा,अशी सगळीकडे परिस्थिती झालेली आहे.जी अवनिती/कुनिती इंग्रजांनी वापरली राज्य करण्यासाठी तीच अवनिती/ कूनिती आपण वापरतो,या जीवन वाटचाली का? आणि कशासाठी? हा ही मोठा यक्ष प्रश्न आहे?हे चित्र लवकरच बदलले पाहिजे.या पुढील चित्र तर फारच भयाण असणार आहे,तेव्हा यावर आताच विचार व्हायला हवा आणि त्यातून उपाय योजना ही.हे साहित्याच्या नावाखाली चालणारे बाजार थांबविले पाहिजे.आपल्या आपल्यात वाद लावून द्यायचे आणि त्यांनी स्वतःचा फायदा  करून घ्यायचा.दोन मांजरी आणि एका माकडाची गोष्ट ही आपणा सर्वांना परिचित आहेच.तीच अवस्था आपली आपणच करून घेतली आहे.
        आपण स्वतःस साहित्यिक म्हणवितो आणि आपणच एकमेकांना किंमत,मान सन्मान देत नसेल तर काय उपयोग? कोणत्या तोंडाने स्वतःस साहित्यिक म्हणवून घेतो?आपल्या लेखणीचा आणि माणूस या पात्राशी काही संबंध उरतो का?एकीकडे मोठ्या रुबाबात म्हणायचे आम्ही व्यवसाय करत नाही ही एक सेवा आहे.मग,ती खरचं सेवा करतो का? हे प्रत्येकाने आत डोकावून एकदा पाहिले पाहिजे.येथे पैशासाठी मित्र तुटतात.सारीच नाती जर पैशात मोजत बसलो तर,भावनेला किंमत शून्य उरते.आणि जेथे भावनेला किंमत नाही तेथे माणुसकी कशी विरजणार?साऱ्याच गोष्टी पैशात तोलून चालत नसतात.तेथे माणुसकी ही पहावी,ती कृतीतून ओसंडावी लागते.स्वार्थ पाहून जर आपण काम करत असेल तर त्या कार्याचा/ कृतीचा/ सेवेचा उपयोग नाही.बऱ्याच काव्य संमेलन मध्ये असे घडतांना दिसते की,काव्य संमेलनासाठी काही ठराविक शुल्क आकारले जाते?ज्यांनी पैसे भरले त्यांना त्या मंचावर २ मिनिट किंवा ३ मिनिट कालावधी दिलेला असतो तरी त्याच्या दुप्पट,चौपट वेळ त्या मंचावर घालवताना दिसतात.स्वतःचे पुराण ऐकवत,समोरच्यांना पकवत बसायचे.तेव्हा,नियम सर्वांना सारखे का ठेवले जात नाही?मान्य त्यांनी त्यासाठी पैसे खर्च केलेले आहे. पण,ज्यांना सन्मानचिन्ह नको असते,फक्त एक कविता सादर करायची असते ,कोणतीही अपेक्षा नसते की आयोजकांनी एखादे फुल/ श्रीफळ/ शाल/ पुस्तक/ सन्मान चिन्ह असे काही द्यावे.फक्त अपेक्षा असते २ ते ३ मिनिटांची एखादी कविता सादर करू द्यावी.पण,ती ही संधी बरेच ९९% आयोजक देतच नाही.खूप विचित्र कार्य ते करत असतात.हे त्यांना समजत नसतं,कारण ते आयोजक असतात ना? पण,आपण काही गोष्टींसाठी विनाकारण नको तेथे,नको तितका वेळ घालविलेला असतो आणि ज्याला काव्यसंमेलन म्हणतो तेथेच फक्त ज्यांनी पैसे दिले त्यांनाच काव्य सादरीकरण करण्याचा,त्यांचा संसार सांगण्याचा नको तितका वेळ दिला जातो? तेथे प्रोटोकॉल का पाळला जात नाही.जेव्हा आयोजक स्वतः बोलवून घेतात या म्हणून तेव्हाही काव्य सादरीकरण करण्याची संधी दिली जात नाही तेव्हा बुध्दीची कीव येते.असे कसे हे लोक वागतात?संयमीवृत्ती तर बिल्कुल दिसत नाही.पैसे भरले म्हणून त्या-त्या व्यक्तींनी २-३ मिनिट ऐवजी १० मिनिटे घेतली तरी त्यांना अडविले जात नाही.समानता कोठे नांदताना तर दिसत नाही,अहो,ती फक्त अन् फक्त संविधानात दिलेली पहायला भेटते.प्रत्यक्ष व्यावहारिक जगात तर ती कोठेही दिसत नाही.येथे भावनेचा ही व्यवहार पहायला भेटतो.पैसा फेको,तमाशा देखो अशी अवस्था झालेली आहे.मी नाही त्यातली/ त्यातला कडी लावा आतली..अशी गोष्ट आहे.
     अशा ठिकाणी पैशाचा व्यापार होतांना दिसतो.बरे अशा ठिकाणी विचारी लोक मग जेवण ही करत नाही.कारण जेवण ही काढतात ही हिशोब काढणारी माणसे.असे अनुभव घेतलेले आहे?कोणी बोलविल्याशिवाय कोठे जायचेच नाही?आपणच आपल्याला काही नियम घालून घ्यायचे.हेच उत्तम असते.आपल्या तत्त्वात बसेल तरच ते कार्य करायचे.कारण येथे जग नावेच ठेवायला बसले आहे.म्हणून आपल्या बुध्दीला जे पटेल तेच करावे.
       पण,या अशा काही लोकांची अक्षरशः कीव येते.असे लोक पैशासाठीच फक्त प्रत्येक गोष्टीकडे पाहतात का?पण,येथे ती लोक चुकत नाही.तर चुकतो आपणच? आपण का म्हणून त्यांच्या कार्यक्रमाला जायचे?जेथे काव्याला,माणुसकीला किंमत नाही..किंमत फक्त अन् फक्त पैशाला असेल तर.वेगवेगळी आमिषे दाखवायची आणि त्याला आपण फसले जायचे.हे चित्र बदलले पाहिजे.कोठे तरी आपणच या गोष्टींना लगाम घातला पाहिजे.
        साटे लोटे ही पहायला भेटते..तू मला मोठे कर? मी तुला मोठे करतो? तू माझे भले कर मी तुझे भले करतो..ते ही दुसऱ्यांच्या जीवावर..त्याला छान असे नाव द्यायचे..मग झाले.मला तू पाहुणा,अध्यक्ष, वक्ता कर मी तुला माझ्या कार्यक्रमात ते पद देतो..मग तर झाले.पण एका कवीला भूक असते त्याच्या एका काव्याची..एक कविता मंचावर म्हणण्याची.ती भूक ही त्याची क्षमविली जात नाही.तर ज्याचे पोट आधीच भरलेले आहे,त्यालाच पुन्हा पुन्हा वाढायचे? ते ही त्याचे पोट फुटूपर्यंत.
        विचार बदलण्याची गरज आहे.पाय खेचणारे खेकडे अवतीभवती दिसतात.फक्त हातात हात घालून चालणारे माणसे हवी सोबतीला.जेथे मैत्रीच्या नावाखाली,भावा बहिणीच्या नावाखाली फसवणूक करणारे नको?कधी तरी आपल्याला कोणी तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केलेली आहे हे तरी विसरू नये.काही जण आपलेच बोट धरून चालतात आणि नंतर चालायला येवू लागले की,आपल्याला तेथेच सोडून पुढे धावत सुटतात.
        आयोजक फक्त पैशासाठी अशा संमेलनाचे आयोजन करीत असतो अशी कितीतरी कार्यक्रम होतात की अगदी कंटाळवाणी होऊन जातात त्यांच्यामध्ये कवितेचा दर्जा असतो ना ऐकणारे कवी दर्जाचे असतात मग अशा कार्यक्रम लक्षात तरी राहतील का येणाऱ्यांच्या ! तरी अशा कार्यक्रमांची रेलचेल आपल्याला पाहण्यास भेटते.अशी कार्यक्रम रोजच कोठे ना कोठे होतच असतात.यातील काहीच कार्यक्रम लक्षात राहतात.जास्त प्रकाश झोतात येणे ही बरे नाही असेही कधी कधी वाटते? सर्वांना माहीतच आहे.उत्तम डोळ्यांची जिला देणगी लाभली..ती मोनालिसा संपूर्ण विश्वात एका रात्रीत प्रसिद्धीस आली..पण शेवटी तिने ही फाशी घेतली अन् स्वतः चे आयुष्य विनाकारण संपविले.आपले जीवन इतके स्वस्त आहे का? कोणामुळे ते संपवावे? प्रत्येकालाच एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचा आहे. एक दिवस जायचेच आहे,पण जितके जीवन आपल्याला मिळालेले आहे ते जीवन आपण भरभरून जगू या..कोणाच्या हातचे कटपुतली होवून जगण्यात काहीच अर्थ नाही.फुल पाखरासारखे आयुष्य असावे..फक्त प्रेम द्यावे...अन् घ्यावे..आनंदाची उधळण करावी.जन्मांचे सार्थक करावे.ज्ञानेश्वर महाराजांना अवघे १९ वर्षाचे आयुष्य लाभले म्हणजे त्यांनी संजीवन समाधी घेतली.पण,अल्प जीवनात खूप मौल्यवान देणगी ते आपणास देवून गेले.जीची किंमत होवूच शकत नाही.तेव्हा या चांगल्या गोष्टींचा विचार करू या.मुक गिळून ही जगण्यात अर्थ नाही.गुलामी तर जगूच नये.अन्याय तर बिल्कुल सहन करू नये..अन्यायाला वाचा ही फोडलीच पाहिजे.नाही तर त्यांना वाटेल आपण खूप छान कार्य करत आहोत.
         ज्यांचा आवाज चांगला.म्हणजे ग्येय कविता असेल तरच तो/ ती उत्तम कवी/ कवयित्री...जे मनापासून कविता म्हणतात ते कवी नाही का?त्यांना भावना,मन नाही का? त्यांना जाणीव नाही का? प्रत्येक जण लताताई/आशाताई नाही ना होवू शकणार? याचे ही भान राहत नाही.खूप काही बोलण्यासारखे आहे....खूप काही विचार करण्यासारखे आहे...खूप काही बदल होणे अपेक्षित आहे...तो बदल कमीत कमी प्रत्येकाने आपल्या स्वतःत करून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.कारण आपण राजकारणी नाही .फक्त निवडणुकी पुरते आश्वासने द्यायची आणि एकदा निवडून आले की?तू कोण?अन् मी कोण?मी नाही ओळखत?साधी ओळख ही द्यायची नाही.असे राजकारण तरी खेळू नका.एकनिष्ठ,प्रामाणिक रहा..दिलेल्या वचनाला जागायला शिका.महत्त्वाचे माणूस म्हणून जगायला शिका.स्वतः जगा इतरांना जगवा,हसा अन् हसवा..हे जीवन पुन्हा नाही.आहे त्या जीवनाचा सदुपयोग करायला शिका.माणूस म्हणून जन्म घातला तर माणूस म्हणून जगायला शिका.

नको आयुष्य हे शंभर वर्षाचे ?
हवे फुलपाखरासारखे  बेधुंद
आनंदी जीवन हे चार दिसाचे
देण्यास हो एकमेंका परमानंद....

सौ.प्रतिमा अरुण काळे/ खेमनर
निगडी प्राधिकरण,पुणे ४४
मोबाईल नंबर:- ८८३०६५४६६१

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...