आज जिकडे तिकडे स्पर्धा चालू आहे असे जाणवते म्हणजे १०१% ती चालूच आहे.पण,एकमेकांशी स्पर्धा करून काय साध्य करणार आहोत आपण?तोडा, फोडा आणि राज्य करा,अशी सगळीकडे परिस्थिती झालेली आहे.जी अवनिती/कुनिती इंग्रजांनी वापरली राज्य करण्यासाठी तीच अवनिती/ कूनिती आपण वापरतो,या जीवन वाटचाली का? आणि कशासाठी? हा ही मोठा यक्ष प्रश्न आहे?हे चित्र लवकरच बदलले पाहिजे.या पुढील चित्र तर फारच भयाण असणार आहे,तेव्हा यावर आताच विचार व्हायला हवा आणि त्यातून उपाय योजना ही.हे साहित्याच्या नावाखाली चालणारे बाजार थांबविले पाहिजे.आपल्या आपल्यात वाद लावून द्यायचे आणि त्यांनी स्वतःचा फायदा करून घ्यायचा.दोन मांजरी आणि एका माकडाची गोष्ट ही आपणा सर्वांना परिचित आहेच.तीच अवस्था आपली आपणच करून घेतली आहे.
आपण स्वतःस साहित्यिक म्हणवितो आणि आपणच एकमेकांना किंमत,मान सन्मान देत नसेल तर काय उपयोग? कोणत्या तोंडाने स्वतःस साहित्यिक म्हणवून घेतो?आपल्या लेखणीचा आणि माणूस या पात्राशी काही संबंध उरतो का?एकीकडे मोठ्या रुबाबात म्हणायचे आम्ही व्यवसाय करत नाही ही एक सेवा आहे.मग,ती खरचं सेवा करतो का? हे प्रत्येकाने आत डोकावून एकदा पाहिले पाहिजे.येथे पैशासाठी मित्र तुटतात.सारीच नाती जर पैशात मोजत बसलो तर,भावनेला किंमत शून्य उरते.आणि जेथे भावनेला किंमत नाही तेथे माणुसकी कशी विरजणार?साऱ्याच गोष्टी पैशात तोलून चालत नसतात.तेथे माणुसकी ही पहावी,ती कृतीतून ओसंडावी लागते.स्वार्थ पाहून जर आपण काम करत असेल तर त्या कार्याचा/ कृतीचा/ सेवेचा उपयोग नाही.बऱ्याच काव्य संमेलन मध्ये असे घडतांना दिसते की,काव्य संमेलनासाठी काही ठराविक शुल्क आकारले जाते?ज्यांनी पैसे भरले त्यांना त्या मंचावर २ मिनिट किंवा ३ मिनिट कालावधी दिलेला असतो तरी त्याच्या दुप्पट,चौपट वेळ त्या मंचावर घालवताना दिसतात.स्वतःचे पुराण ऐकवत,समोरच्यांना पकवत बसायचे.तेव्हा,नियम सर्वांना सारखे का ठेवले जात नाही?मान्य त्यांनी त्यासाठी पैसे खर्च केलेले आहे. पण,ज्यांना सन्मानचिन्ह नको असते,फक्त एक कविता सादर करायची असते ,कोणतीही अपेक्षा नसते की आयोजकांनी एखादे फुल/ श्रीफळ/ शाल/ पुस्तक/ सन्मान चिन्ह असे काही द्यावे.फक्त अपेक्षा असते २ ते ३ मिनिटांची एखादी कविता सादर करू द्यावी.पण,ती ही संधी बरेच ९९% आयोजक देतच नाही.खूप विचित्र कार्य ते करत असतात.हे त्यांना समजत नसतं,कारण ते आयोजक असतात ना? पण,आपण काही गोष्टींसाठी विनाकारण नको तेथे,नको तितका वेळ घालविलेला असतो आणि ज्याला काव्यसंमेलन म्हणतो तेथेच फक्त ज्यांनी पैसे दिले त्यांनाच काव्य सादरीकरण करण्याचा,त्यांचा संसार सांगण्याचा नको तितका वेळ दिला जातो? तेथे प्रोटोकॉल का पाळला जात नाही.जेव्हा आयोजक स्वतः बोलवून घेतात या म्हणून तेव्हाही काव्य सादरीकरण करण्याची संधी दिली जात नाही तेव्हा बुध्दीची कीव येते.असे कसे हे लोक वागतात?संयमीवृत्ती तर बिल्कुल दिसत नाही.पैसे भरले म्हणून त्या-त्या व्यक्तींनी २-३ मिनिट ऐवजी १० मिनिटे घेतली तरी त्यांना अडविले जात नाही.समानता कोठे नांदताना तर दिसत नाही,अहो,ती फक्त अन् फक्त संविधानात दिलेली पहायला भेटते.प्रत्यक्ष व्यावहारिक जगात तर ती कोठेही दिसत नाही.येथे भावनेचा ही व्यवहार पहायला भेटतो.पैसा फेको,तमाशा देखो अशी अवस्था झालेली आहे.मी नाही त्यातली/ त्यातला कडी लावा आतली..अशी गोष्ट आहे.
अशा ठिकाणी पैशाचा व्यापार होतांना दिसतो.बरे अशा ठिकाणी विचारी लोक मग जेवण ही करत नाही.कारण जेवण ही काढतात ही हिशोब काढणारी माणसे.असे अनुभव घेतलेले आहे?कोणी बोलविल्याशिवाय कोठे जायचेच नाही?आपणच आपल्याला काही नियम घालून घ्यायचे.हेच उत्तम असते.आपल्या तत्त्वात बसेल तरच ते कार्य करायचे.कारण येथे जग नावेच ठेवायला बसले आहे.म्हणून आपल्या बुध्दीला जे पटेल तेच करावे.
पण,या अशा काही लोकांची अक्षरशः कीव येते.असे लोक पैशासाठीच फक्त प्रत्येक गोष्टीकडे पाहतात का?पण,येथे ती लोक चुकत नाही.तर चुकतो आपणच? आपण का म्हणून त्यांच्या कार्यक्रमाला जायचे?जेथे काव्याला,माणुसकीला किंमत नाही..किंमत फक्त अन् फक्त पैशाला असेल तर.वेगवेगळी आमिषे दाखवायची आणि त्याला आपण फसले जायचे.हे चित्र बदलले पाहिजे.कोठे तरी आपणच या गोष्टींना लगाम घातला पाहिजे.
साटे लोटे ही पहायला भेटते..तू मला मोठे कर? मी तुला मोठे करतो? तू माझे भले कर मी तुझे भले करतो..ते ही दुसऱ्यांच्या जीवावर..त्याला छान असे नाव द्यायचे..मग झाले.मला तू पाहुणा,अध्यक्ष, वक्ता कर मी तुला माझ्या कार्यक्रमात ते पद देतो..मग तर झाले.पण एका कवीला भूक असते त्याच्या एका काव्याची..एक कविता मंचावर म्हणण्याची.ती भूक ही त्याची क्षमविली जात नाही.तर ज्याचे पोट आधीच भरलेले आहे,त्यालाच पुन्हा पुन्हा वाढायचे? ते ही त्याचे पोट फुटूपर्यंत.
विचार बदलण्याची गरज आहे.पाय खेचणारे खेकडे अवतीभवती दिसतात.फक्त हातात हात घालून चालणारे माणसे हवी सोबतीला.जेथे मैत्रीच्या नावाखाली,भावा बहिणीच्या नावाखाली फसवणूक करणारे नको?कधी तरी आपल्याला कोणी तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केलेली आहे हे तरी विसरू नये.काही जण आपलेच बोट धरून चालतात आणि नंतर चालायला येवू लागले की,आपल्याला तेथेच सोडून पुढे धावत सुटतात.
आयोजक फक्त पैशासाठी अशा संमेलनाचे आयोजन करीत असतो अशी कितीतरी कार्यक्रम होतात की अगदी कंटाळवाणी होऊन जातात त्यांच्यामध्ये कवितेचा दर्जा असतो ना ऐकणारे कवी दर्जाचे असतात मग अशा कार्यक्रम लक्षात तरी राहतील का येणाऱ्यांच्या ! तरी अशा कार्यक्रमांची रेलचेल आपल्याला पाहण्यास भेटते.अशी कार्यक्रम रोजच कोठे ना कोठे होतच असतात.यातील काहीच कार्यक्रम लक्षात राहतात.जास्त प्रकाश झोतात येणे ही बरे नाही असेही कधी कधी वाटते? सर्वांना माहीतच आहे.उत्तम डोळ्यांची जिला देणगी लाभली..ती मोनालिसा संपूर्ण विश्वात एका रात्रीत प्रसिद्धीस आली..पण शेवटी तिने ही फाशी घेतली अन् स्वतः चे आयुष्य विनाकारण संपविले.आपले जीवन इतके स्वस्त आहे का? कोणामुळे ते संपवावे? प्रत्येकालाच एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचा आहे. एक दिवस जायचेच आहे,पण जितके जीवन आपल्याला मिळालेले आहे ते जीवन आपण भरभरून जगू या..कोणाच्या हातचे कटपुतली होवून जगण्यात काहीच अर्थ नाही.फुल पाखरासारखे आयुष्य असावे..फक्त प्रेम द्यावे...अन् घ्यावे..आनंदाची उधळण करावी.जन्मांचे सार्थक करावे.ज्ञानेश्वर महाराजांना अवघे १९ वर्षाचे आयुष्य लाभले म्हणजे त्यांनी संजीवन समाधी घेतली.पण,अल्प जीवनात खूप मौल्यवान देणगी ते आपणास देवून गेले.जीची किंमत होवूच शकत नाही.तेव्हा या चांगल्या गोष्टींचा विचार करू या.मुक गिळून ही जगण्यात अर्थ नाही.गुलामी तर जगूच नये.अन्याय तर बिल्कुल सहन करू नये..अन्यायाला वाचा ही फोडलीच पाहिजे.नाही तर त्यांना वाटेल आपण खूप छान कार्य करत आहोत.
ज्यांचा आवाज चांगला.म्हणजे ग्येय कविता असेल तरच तो/ ती उत्तम कवी/ कवयित्री...जे मनापासून कविता म्हणतात ते कवी नाही का?त्यांना भावना,मन नाही का? त्यांना जाणीव नाही का? प्रत्येक जण लताताई/आशाताई नाही ना होवू शकणार? याचे ही भान राहत नाही.खूप काही बोलण्यासारखे आहे....खूप काही विचार करण्यासारखे आहे...खूप काही बदल होणे अपेक्षित आहे...तो बदल कमीत कमी प्रत्येकाने आपल्या स्वतःत करून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.कारण आपण राजकारणी नाही .फक्त निवडणुकी पुरते आश्वासने द्यायची आणि एकदा निवडून आले की?तू कोण?अन् मी कोण?मी नाही ओळखत?साधी ओळख ही द्यायची नाही.असे राजकारण तरी खेळू नका.एकनिष्ठ,प्रामाणिक रहा..दिलेल्या वचनाला जागायला शिका.महत्त्वाचे माणूस म्हणून जगायला शिका.स्वतः जगा इतरांना जगवा,हसा अन् हसवा..हे जीवन पुन्हा नाही.आहे त्या जीवनाचा सदुपयोग करायला शिका.माणूस म्हणून जन्म घातला तर माणूस म्हणून जगायला शिका.
नको आयुष्य हे शंभर वर्षाचे ?
हवे फुलपाखरासारखे बेधुंद
आनंदी जीवन हे चार दिसाचे
देण्यास हो एकमेंका परमानंद....
सौ.प्रतिमा अरुण काळे/ खेमनर
निगडी प्राधिकरण,पुणे ४४
मोबाईल नंबर:- ८८३०६५४६६१
Comments
Post a Comment