दिनांक २७ एप्रिल रोजी हॉटेल ईशा येथे चंद्रकिरण काव्य मंडळाचा ३१ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साप्ताहिक अंबरचे संस्थापक पं. सुरेश साखवळकर होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाची सुरुवात पहलगाम येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. सौ . विजया शुक्ला यांनी मधुर आवाजात ईशस्तवन म्हटले. चंद्रकिरणच्या अध्यक्षा सौ. संगीता पवार यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार श्री. सतीश साठे यांनी पं. सुरेश साखवळकर यांचा परिचय करून दिला, तर गझलकारा नंदिनी काळे यांनी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांची ओळख करून दिली.
सौ. संगीता पवार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पं. सुरेश साखावळकर आणि प्रमुख पाहुण्या डॉ स्नेहल कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. चंद्रकिरणच्या कवी व गझलकारा अर्चना मुरुगकर, नंदिनी काळे आणि श्रीराम घडे यांच्या काव्यार्चना, काहूर अंतरीचे व रूमणं या काव्य व गझलसंग्रह प्रकाशनासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले.
पं. साखवळकर सरांनी चंद्रकिरण काव्य मंडळाच्या स्थापनेचा आणि त्याच्या प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांतील कवी विद्यार्थ्यांना संमेलनात सहभागी करून तरुण पिढीला साहित्याशी जोडण्याचे महत्व अधोरेखित केले. डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी उत्तम वाचन, रसिकता आणि जाणीवांमध्ये जिवंतपणा फुलवण्याचे महत्त्व स्पष्ट करत काव्यलेखनावर मार्मिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात पीसिईटी इन्फिनिटी रेडिओ 90.4 FM च्या निर्मिती प्रमुख RJ माधुरी कुलकर्णी ढमाले यांचा उपाध्यक्ष श्री. श्रीकांत पेंडसे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर RJ माधुरी यांनी "किती बोलतो आपण सारे" ही त्यांची स्वरचित कविता रसिकांसमोर सादर केली.
कार्यक्रमाचे पहिले सत्र काव्य संमेलन म्हणून आणि दुसरे सत्र गझल मुशायर्यासाठी आयोजित करण्यात आले. सौ. रश्मी थोरात यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन केले, तर गझल मुशायऱ्याचे संचालन सौ. अर्चना मुरुगकर यांनी नेटकेपणाने पार पाडले.
श्री. श्रीकृष्ण मुळे यांनी आभार प्रदर्शन केले. श्री. दत्तात्रेय मेढी यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्षा सौ. संगीता पवार, कार्यवाह सौ रश्मी थोरात, सहकार्यवाह सौ. माधवी खडक्कार, खजिनदार श्री सतीश साठे, श्री. श्रीकृष्ण मुळे आणि श्री. श्रीराम घडे यांनी मोलाचे योगदान दिले.
चंद्रकिरण काव्य मंडळाचा हा ३१ वा वर्धापन दिन रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि साहित्यिक वातावरणात संस्मरणीय ठरला.
---
Comments
Post a Comment