महाराष्ट्राच्या विविध भागांतील नवोदित कवी कवयित्रींना एक उत्कृष्ट प्रायोगिक मंच मिळवून देण्याच्या उद्देशाने कवी अनुकूल माळी यांच्या संकल्पनेतून, कवी प्रदीप बडदे यांच्या मार्मिक नियोजनतून तसेच कवयित्री कल्पना देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली कवितेचा पार उभारला गेला. दि.१४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सेंट्रल पार्क, घणसोली, नवी मुंबई येथे "कवितेच्या पारावर" या नव्या कोऱ्या मैफिलीचा तिसरा प्रयोग उत्साहात पार पडला.
हरवलेल्या रसिकांचा शोध घेत मनाला मनापासून साद घालत ठाणे, दिवा, कल्याण, कोपरखैरणे, पनवेल, सानपाडा, नेरूळ, वाशी, घणसोली अशा नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील साहित्यिकांनी आपली प्रार्थनीय उपस्थिती दर्शविली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व ताराराणी भोसले यांच्या खंबीर लढ्याचा ठाव घेत गीतं आणि कविता वेगवेगळ्या संकल्पनेतून सादर केल्या गेल्या. पारावर जमलेल्या प्रत्येक कवीने स्वर व शब्दांच्या साथीने आपल्या कवितेत प्राण ओतला व रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. सामाजभान, वास्तवभान त्याबरोबरच बोलगाणी, गीतगायन, भारूड व गझल अशाप्रकारे कवींनी विविध अंगाने सादरीकरण केले.
या मैफिलीत अनिल सोनवणे, कल्पनाताई देशमुख, रश्मी राऊत, डॉ.सुमेध वैद्य, काजल आठवले, श्वेता मांदडकर, स्वाती भोसले, महेश भोसले, काव्या भोसले, हर्षल देशमुख, राधा गानू मॅडम, नारायण लांडगे, नेत्रा, सुनेत्रा, मंगलामाई या कवी कवयित्री तसेच कलाकारांनी उत्कृष्ट सहभाग घेऊन आपल्या कवितांचे उत्तम सादरीकरण केले.
अशा या रंगतदार मैफिलीला अध्यक्षा म्हणून शास्त्रीय गायीका मा. राधा गानू या लाभल्या होत्या. साहित्यातील प्रवास व सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले मार्गदर्शन प्रबोधनपूर्वक ठरले. द.भा. धामणस्कर यांच्या सहवासातील स्वातंत्र्यपूर्व काळात घडलेले काही किस्से त्यांनी सांगितले. मैफिलीत शारदा स्तवन सादर करून गानू माईंनी अनोखी शोभा आणली व मान्यवरांचा उत्साह द्विगुणित केला. मैफिलीला मार्गदर्शिका कल्पनाताई देशमुख यांच्या कन्या कु. प्रतिक्षा देशमुख या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. संशोधन क्षेत्रातील कार्याचा प्रवास आणि अनुभव मांडत असताना एक कणखर व बाणेदार असे तरूण नेतृत्व प्रतिक्षाच्या व्यक्तीमत्त्वाबाबत सहजपणे येथे टिपण्यात आले. या मैफिलीची संकल्पना आखून कवी/ पत्रकार प्रदीप बडदे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले तसेच सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. कवितेच्या पारावर जमलेल्या सर्व साहित्यिक कलाकारांनी नवी विचारप्रणाली मांडून एकमेकांचा निरोप घेतला.
*--प्रदीप बडदे, (नवी मुंबई)*
Comments
Post a Comment